राज्यभर तीन टप्प्यात होणार आंदोलन
सारंग कराळे
व-हाड दूूत न्युज नेटवर्क
अकोट जि. अकोला:
नगरपरिषद व नगरपंचायतमधील कार्यरत कर्मचा-यांच्या विविध मागण्यासाठी अनेकदा निवेदन देऊन व आंदोलन करून सुद्धा शासनाकडून कोणतीही पुर्तता होत नसल्यामुळे 15 एप्रिलरोजी राज्यासह जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचा-यांनी लेखणी बंद आंदोलन केले.
संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे, राज्य उपाध्यक्ष दीपक रोडे, राज्य सचिव रामेश्वर वाघमारे, गजानन इंगळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर तीन टप्प्यातील आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकार यांनी दिली.
एप्रिल व मे च्या दरम्यान तीन टप्प्यात आंदोलन केले जाणार आहे. 1 एप्रिल रोजी सर्व नगर परिषद कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून काम केले असून 15 एप्रिल रोजी लेखणीबंद आंदोलन यशस्वी केले आहे. यानंतरही शासनाला जाग आली नाही तर 1 मे या महाराष्ट्र दिनापासून अत्यावश्यक सेवेसह बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करणार आहे. आता निर्धार पक्का केला असून आंदोलनातून माघार घेतली घेणार नाही असा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतलेला आहे. राज्यातील नगरपरिषदांमध्ये रोजंदारी कर्मचारी यांचे विनाअट समावेशन करणे, सहाय्यक अनुदान ऐवजी शंभर टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागार मार्फत देणे. सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते रोखीने देणे, 10 दहा वीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे व इतर मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातील सर्व कर्मचा-यांनी आज लेखणी बंद आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केले.
हे आंदोलन जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शर्मा, रमेश गिरी, जिल्हा सचिव दीपक सुरवाडे, स्थानिक अध्यक्ष ईश्वरदास पवार अकोट, भरत मल्लिये तेल्हारा, नागोराव सुरजुसे बाळापुर, शिरिष गांधी मुर्तीजापुर, नबी खान पातुर, रुपेश पिंजरकर बार्शिटाकळी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.